चंद्रपूर, 2 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना लसीकरण अभियानाला धक्कादायक ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात लसींचा साठा संपल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेला जिल्हास्थानातील लशींचा साठा संपुष्टात आला आहे. जिल्ह्यात तालुकास्थानी आधीच पोचता केलेल्या आरोग्य केंद्रांवरील 3 हजार कोरोना लशींचा साठा दिवसभरात संपणार आहे. (Chandrapur district ran out of corona vaccines)
प्रशासनाने मागणी केलेला साठा जिल्ह्यात न पोचल्यास लसीकरण केंद्रे तात्पुरत्या स्वरुपात बंद करावी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. अॅपवर नोंदणी झालेल्या व 45 वर्षांवरील व्यक्ती अशा एकूण 14 लाखांहून अधिक नागरिकांना जिल्ह्यात लसीकरण अपेक्षित आहे. कोविड योद्धा, कोमॉरबीड रुग्ण आदींच्या लसीकरणासाठी जिल्ह्यात 30 केंद्रे उघडण्यात आली होती. मात्र त्यात भर घालून 45 वर्षे वयावरील व्यक्तींना सुविधा देण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या 91 करण्यात आली. आता त्या अनुरूप लशींचा साठा देखील उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र 1 लाख 17 हजार लशींचा साठा नोंदवूनही आवक नसल्याने अभियान ठप्प होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
हे ही वाचा-प्रसिद्ध ब्रँडच्या मसाल्यात सापडल्या जीवंत अळ्या; ग्राहकाची तक्रार
पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी कोव्हिशिल्डची लस पाठविण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यातील मागणीनुसार, कोव्हॅक्सिन लशीचे 4 हजार 800 डोस जिल्ह्याला मिळाले. 31 मार्चपर्यंत ही लस 236 जणांना टोचण्यात आली. 31 मार्चपर्यंत जिल्ह्यात हेल्थ केअर वर्कर, फ्रन्टलाईन, 60 वर्षांवरील व सहव्याधी असणाऱ्या 45 वर्षांवरील एक लाख 10 हजार 172 जणांनी लस घेतली. सर्व वयोगटातील पात्र नागरिकांच्या संख्येनुसार जिल्ह्याला 14 लाख 80 हजार लशींची आवश्यकता आहे.
1 लाख 17 हजार लशींची मागणी
नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. मात्र, पुरेसा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने एक लाख 17 हजार लशींची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.
11 हजार 34 जणांनी घेतली लस
कोणती व्याधी नसणाऱ्या 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचे आजपासून लसीकरण सुरू झाले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 11 हजार 34 जणांनी लस घेतली. बऱ्याच नागरिकांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. परंतु पुरेशा लशींअभावी वेटिंगवर राहावे लागणार आहे.