- News18 Lokmat
- Last Updated: April 3, 2021, 7:23 PM IST
मुंबई, 3 एप्रिल : विदर्भातील चंद्रपूराचं तापमान 2 एप्रिल रोजी 43.8 अंशावर पोहोचलं होतं, विशेष म्हणजे चंद्रपूर हे शहर केवळ देशातील नव्हते तर जगातील उच्चांकी तापमान असलेलं चौथं शहर ठरलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा कडक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही तापमानाचा पारा चाळीशीपार गेला होता. ( Vidarbha Maximum temperature over forty)
हवामान खात्याच्या वतीनं ट्विट करत के.एस. होसाळीकर यांनी राज्यातील तापमानाची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यापैकी अधिकतर चाळीशीपार होते. त्यानुसार परभणी 41.1, जालना 39.0, अहमदाबाद 39, बारामती 38.1, सांगली 37, नाशिक 38.0, पुणे 37.9, मालेगाव 40.2, जळगाव 41.2, नांदेड 41 आणि सोलापूरमध्ये 40.8 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदविण्यात आलं आहे.
हे ही वाचा-विदर्भात सूर्याचं आग ओकणं सुरूच; पुण्यात पुढील तीन दिवस कसं असणार हवामान?
आधीच राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधित कोरोनाची रुग्णसंख्या असताना त्यात नागरिकांना कडक्याचा सामना करावा लागत आहे. नागपूरात कोरोनाची दाहकता पाहायला मिळत आहे. विदर्भात तर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी निर्बंध अधिक कडक केले आहेत. तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे सामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले असून लोकांचं जनजीवन प्रभावीत झालं आहे.